पुणे : ‘आईसमान वाटे त्यांचे सुष‘मा’ ऐसे नाव..’ अशा शब्दांत कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांचे सहा ऑगस्टला रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अचानक झालेले निधन सर्वांनाच चटका लावून गेले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संकर्षण कऱ्हाडे याने कविता केली आहे.
सुषमा स्वराज यांनी अत्यंत खंबीरपणे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रिपद सांभाळले. भारताची प्रतिमा सुधारण्यात, अन्य देशांशी असलले संबंध सुधारण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांतून त्यांचे वेगळेपण दिसले. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी लोकसभेची आताची निवडणूक लढवली नाही. पदाला चिकटून राहण्याचा अट्टाहास केला नाही. त्यांची ही वृत्तीदेखील लोकांना भावली. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांनी सर्वसामान्य भारतीयांच्या मनात मानाचे स्थान मिळवले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न संकर्षणने केला आहे. अगदी साध्या, सोप्या शब्दांत त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
संकर्षणची कविता
भाळी कुंकू, चेहऱ्यावर आश्वस्थणारे भाव,
आईसमान वाटे त्यांचे सुष‘मा’ ऐसे नाव
प्रमाण शब्द, खोल विचार, ओघवती ती वाणी
चारित्र्यवान, सात्विक, शीतल, स्त्री हिंदुस्थानी..
आनंदाच्या क्षणी तुम्ही का, निरोप आमचा घ्यावा..?
असे वाटते सवेच तुमच्या सांगावा हा द्यावा ..
बंधमुक्त काश्मीर झाला, अन् अपुल्या हिमरांगा
सांगावा हा स्वर्गी जाऊन, अटलजींना सांगा..
तुम्ही दोघांनी, हिंदुस्थानी, जन्म पुन:श्च घ्यावा
राजकारणातला इमान, पुन्हा पुन्हा शिकवावा.
जय हिंद
- संकर्षण कऱ्हाडे
(सुषमा स्वराज यांच्या वेगळेपणाच्या गोष्टी सांगणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)